आयएनएस विक्रांतच्या नावे गोळा केलेल्या पैश्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राऊतांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. मात्र यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. सोमय्या म्हणाले, संजय राऊत एक कागदही दाखवू शकले नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही. माझं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, ५८ कोटी गोळा केले, कोणत्या चार बिल्डरकडे मनी लाँड्रिंग केलं ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढतच राहणार.
सोमय्या पुढे म्हणाले की, “हा १८ वा आरोप आहे, १७ आरोप बोगस निघाले. उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाहीत. हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने पण थोबाडीत दिली. मी तर पहिल्यापासून सांगत आहे की मी, नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी काही घोटाळा केला असेल तर उद्वव ठाकरेंकडे कागदपत्रं द्या, तपास करा आणि शिक्षा द्या.
तिकडे, संजय राउत मात्र आपल्या आरोपावर ठाम आहेत. ते म्हणाले, भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरातून पैसे गोळा करण्यात आले असून हा आकडा मोठा असू शकतो. मी फक्त राज्यातील आकडा आहे. है पैसे सोमय्यांनी निवडणुकीत वापरले आहेत. पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे चलनात आणले आणि नील सोमय्याच्या व्यवसायात वापरण्यात आले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
निवृत्त सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्याविरोधात एफआयआर दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. तो होत राहील. पण जनतेला हे कळत नाही, की सोमय्या स्पष्ट का बोलत नाहीत? विक्रांत नौका वाचवण्यासाठी त्यांनी मोहीम चालवली हे त्यांना मान्य आहे का? ५७ कोटी रुपये नसतील. काही पैसे तर गोळा झाले असतील. तेवढे सांगा. ते का सांगत नाहीत? त्यांच्या मौनामुळे राऊत यांना जोर चढला आहे. दोघेही जनतेला मूर्ख समजतात का?
361 Total Likes and Views