राज्यात प्रीपेड कार्डद्वारे वीज पुरवठा करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. जसं मोबाईलला रिचार्ज केल्यामुळे कॉलिंग सुरू होतं त्याचप्रमाणे कार्डला रिचार्ज केल्यानंतर गरजे इतकी वीज वापरता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे हे संकेत दिले. वीज चोरीचे प्रमाण वाढले असल्याने राज्य सरकार प्रीपेड कार्डचा पर्याय आणत आहे. जशी गरज असेल तसे कार्ड रिचार्ज करून विजेचा वापर करावा, असा पर्याय आणायचा विचार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, यापुढे आकडा बंद करावाच लागेल. आकड्यांमुळे सरकारची वाट लागली आहे. लोकांना चांगली सेवा पाहिजे असेल तर मानसिकता बदलावी लागेल. विजेच्या वाढत्या संकटाबाबत चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले, ‘राज्यात कोळशाच्या संकटामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पर्यायाने लोडशेडिंग करावं लागत आहे. आम्ही काही कोळसा परदेशातून आयात करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या प्रकल्पांमध्ये परदेशी कोळसा १००% चालत नाहीत. आता उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तीन ते चार हजार मेगाव्हॉट विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून जास्त पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या देशात सर्वत्र विजेची टंचाई निर्माण झाली आहे.
584 Total Likes and Views