मुलांसाठी मोठी बातमी आहे. निकालाची प्रतीक्षा संपली आहे. दहावीचा निकाल २० जूनपर्यंत तर, बारावीचा १० जूनला लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली. शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने यावेळी निकाल लांबतोय की काय, अशी भीती होती. ती दूर झाली आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले जातात, यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हेाती. मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते. पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
349 Total Likes and Views