“अयोध्या तो झाकी है, कशी, मथुरा बाकी है’ असे नारे एकेकाळी लागायचे. सध्या हिंदुत्वाचे वारे आहे. त्यामुळे की काय, आता काशी, मथुरेसोबत आणखी बरेच काही मागितले जात आहे. विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. अनेक मशिदी, इमारती ह्या मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. युनायटेड हिंदू फ्रंट नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेने आज दिल्लीतील जगप्रसिद्ध कुतुबमिनारला धडक देऊन खळबळ उडवून दिली. हा कुतुबमिनार नसून ‘विष्णू स्तंभ’ असल्याचा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. आंदोलक कुतुबमिनार परिसरात जमा झाले होते. तेथे त्यांनी हनुमान चालिसा वाचला. पोलिसांनी त्यांना तेथून उचलले. ह्या प्रकारानन्तर ह्या भागातला बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कुतुबमिनार ही ७३ मीटर उंच इमारत मोगल राजांनी बांधली हा इतिहास आहे. दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा लढाई हरला. त्या विजयाचे प्रतिक म्हणून पहिला मुस्लीम राजा कुतुबुद्दीन ऐबक याने ११९३ मध्ये म्हणजे ८२९ वर्षांपूर्वी हा मिनार बांधायला घेतला. पण तो पूर्ण बांधू शकला नाही. दुसऱ्या मुस्लीम राजाने तीन मजले बांधले. तिसरा राजा फिरोजशहा तुघलक याने ते बांधकाम पाच मजल्यावर नेले. कुतुब मिनारची बांधणी पाहायला जगातील पर्यटक येतात. जगातले हे आश्चर्य आहे. भाजपच्या राजवटीत सारा इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे का? त्याचाच भाग म्हणजे म्हणजे कुतुब मिनारचे नाव बदलून ‘विष्णू स्तंभ’ ठेवा हा हट्ट. मोगल राजाने नव्हे तर सम्राट विक्रमादित्याने कुतुब मिनार बांधला असा हिंदुत्व वाद्यांचा दावा आहे. इथल्या आतल्या भागात हिंदूंच्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत असेही सांगितले जाते. त्या मूर्तींची पूजा करायची आहे आणि म्हणून कुतुब मिनारचे नाव बदल अशी हिंदूंची मागणी आहे. ह्या मागणीचे काय होते?तिथे पूजा सुरु होते काय? ह्याकडे देशाचे लक्ष राहणार आहे.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर हिंदू आक्रमक झाले आहे. आयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मोकळा झाला. आता वाराणशीमधील ग्यानवापी मशिदीचा वाद चिघळला आहे. तिथे आधी मंदिर होतं असा हिंदूंचा दावा . त्यासाठी ते कोर्टात गेले. स्थानिक कोर्टाने व्हिडीओग्राफी करण्याचा आदेश दिला. व्हिडीओ काढायला प्रशासन गेले तेव्हा विरोध झाला. मथुरेच्या शाही ईदगाहचाही सर्व्हे करा अशी मागणी आता पुढे आली आहे. आग्रा इथला ताजमहाल हे शिवाचे मंदिर होते असे ठासून सांगितले जात आहे. ताज महालमधल्या बंद २७ खोल्या उघडा अशी मागणी घेऊन लोक कोर्टात गेले आहेत. हिंदुत्वाचा हा रेटा म्हणजे नव्या इतिहासाची नांदी म्हणायची का?
667 Total Likes and Views