सध्या चर्चेत असलेली राजस्थानमधील उदयपुरसारखी घटना महाराष्ट्रातल्या अमरावती शहरात झाल्याचे उजेडात आल्याने खळबळ आहे. उदयपूरमध्ये २८ जूनला एक शिंप्याचा गळा कापला होता. अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांना २१ जून रोजी रात्री भोसकण्यात आले. मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते व खासदार अनिल बोंडे आणि भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती. यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयए पथक व एटीएस अमरावती शहरात दाखल झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच ५ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे ही हत्या झाली आहे का, असे विचारले असता कोळे यांच्या मुलाने सांगितले की, “माझे वडील खूप सामान्य स्वभावाचे व्यक्ती होते. ते कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नाहीत किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची हत्या झाल्याचं मी ऐकलं, त्यानंतर मी त्यांचं फेसबूक प्रोफाइल तपासले आणि त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण पोलीसच सांगू शकतील. पण मी खात्रीने एवढं सांगू शकतो की त्यांची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झालेली नाही.”
196 Total Likes and Views