भविष्य हे थोतांड आहे असे म्हटले जाते. आजच्या विज्ञानाच्या युगात भविष्याची थट्टा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण भविष्यावर विश्वास ठेवणारेही तेवढ्याच मोठ्या संख्येने आहेत. कुठलेही वृत्तपत्र घ्या. त्यात राशिभविष्य असणारच. आज आपल्या राशीत काय आहे हे पाहणारे लोक आहेत म्हणूनच पेपरवाले ते छापतात. टीव्ही वाहिन्यावरही नित्यनियमाने भविष्य सांगितले जाते. आपल्या भविष्यात काय? हे जाणून घेण्यात जी उत्सुकता असते, त्याची मजा काही वेगळी आहे. पण भविष्यवाणी घाबरवणारीही असू शकते. जगातल्या अनेक भविष्यवेत्त्यांनी हजारो वर्षे पुढचे भविष्य सांगून ठेवले आहे. नास्त्रेदमस हा त्यातलाच एक जगप्रसिद्ध भविष्यकार होऊन गेला. मात्र आम्ही आज ज्याची चर्चा करणार आहोत ती महिला आहे बल्गेरियाची बाबा वेंगा. वेंगा आज हयात नाही. १९९६ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी ती मेली. पण तिने ५०७९ सालापर्यंतचे सांगून ठेवलेली भविष्यवाणी आजही चर्चेत असते. जग तिच्यावर विश्वास ठेवते. वयाच्या १२ व्या वर्षी एका वादळात तिचे डोळे गेले. तेही गूढ आहे. पण आंधळ्या वेंगाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. सोव्हियत संघाचे तुकडे होतील, अमेरिकेवर दहशतवादी हल्ला होईल असे तिने सांगून ठेवले होते.
तिने सांगितलेले काही भविष्य तर भयंकर आहे. ५०७९ मध्ये पृथ्वी नष्ट होईल असे तिने मृत्यूपूर्वी सांगून ठेवले. पृथ्वीच नसेल म्हणजे माणसेच नसतील. आपण नसूच. पण आपल्या नातू, पणतू, खापरपणतू… आणि त्या पुढच्यांना आले ना टेन्शन. आणखी ३ हजार ५७ वर्षे पृथ्वीला धोका नाही. पण पुढे काही खरे नाही.
एक वेळ अशी येईल की, पृथ्वी आपली कक्षा बदलेल, पृथ्वीवर रात्र नसेल अशी तिची भयंकर भविष्यवाणी आहे. दुष्काळासारखी संकटे जगावर येतील असाही इशारा तिने देऊन ठेवला होता. आणि ते खरे होताना दिसते आहे. २०४६ सालापर्यंत माणूस १०० वर्षे सहज जगू शकेल असा आशावादही तिच्या एका भविष्यात आहे. पण पुढे जगणे नसेल किंवा जगणेच दुखणे बनणार असेल तर असे जगणे काय कामाचे? आजाराला कंटाळून लोक आजही आत्महत्या करतातच.
भूकंप, दुष्काळ, महापूर ह्या गोष्टी आता नव्या राहिल्या नाहीत. चीनसारखा देशही आज त्सुनामी भोगतो आहे. महाशक्ती अमेरिकेच्या काही भागात दुष्काळ आहे. निम्मा पाकिस्तान महापुरात होता. हवामान बदलाने मानवजातीचे आयुष्य भयग्रस्त केले आहे. विकासाच्या नावावर माणसाने निसर्गाला छेडले, त्याची फळे आपण भोगत आहोत. पैसा आहे. पण सुखं , मनाची शांती कुठे आहे? सकाळी कोलेजात गेलेली पोरगी घरी येईपर्यंत आईचा जीव टांगला असतो. सुख आले. पण सेक्युरिटी गेली. हा कुठला विकास आहे? भय इथले संपत नाही…असे म्हणण्याची आपली माणसावर आली आहे. ह्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा हिची भविष्यवाणी खरी ठरली तर?
825 Total Likes and Views