तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे.
आपल्या देशातला भाविक हा नेहमीच पापभिरू राहिला आहे. गरिबातला गरीबही खिशातला रुपया-दोन रुपये दानपेटीत टाकतो. भक्तांच्या जोरावरच देशातली मंदिरे टिकून आहेत. एकवेळ कारखाने बंद पडतील. पण कुठले मंदिर बंद पडले असे कधी घडलेले नाही. देवापेक्षा हा भक्तांचाच चमत्कार म्हणावा लागेल. तिरुपती नवसाला पावतो असे म्हणतात. भक्तांना अनुभव आहेत. म्हणूनच ते ह्या देवावर पैशाचा पाऊस पाडताना दिसतात. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराची संपत्ती वाढतच आहे. साऱ्याच देवांच्या हे नशिबी नाही. तिरुपती मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने दरवर्षी आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर करणे सुरु केले आहे.
तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. (भक्तांच्या मते, हा सरकारी आकडा आहे. मार्केटदर दोन लाख कोटी रुपयांवर जाईल. ) ह्या मंदिराकडे ७ हजार १२३ एकर जमीन आहे. आता बोला.
तुम्हाला एक सांगू का? देशात रेल्वेची प्रचंड जमीन आहे. रेल्वेनन्तर चर्च आणि वक्फ बोर्ड हे आपल्या देशातले मोठे जमीनदार आहेत. हिंदूंची मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हे कसे घडले? ७० वर्षात काय घडले? तर हेही घडले. कोणी घडवले? हा संशोधनाचा विषय आहे.
905 Total Likes and Views