एक षटक म्हणजे ६ चेंडू. ६ मध्ये एखाद्या चेंडूवर छक्का लागतो. पण इथे आपल्या मराठमोळ्या भावाने एका षटकात ७ षटकार हाणून विश्वविक्रम केला आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सोमवारी यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या क्वॉर्टर फायनलमध्ये हा पराक्रम केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर उत्तर प्रदेश विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला. महाराष्ट्र संघाने ही लढत ५८ धावांनी जिंकली. विशेष म्हणजे हा पठ्ठा चक्क पुण्याचा आहे. तेव्हा आता कोहली, धोनी विसरायची सवय लावा. गायकवाड येतो आहे.
ऋतुराजने सात षटकार मारून लिस्ट-ए (आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट) मध्ये नवा विक्रम केला. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशपुढे ५० षटकात ३३१ धावांचे आव्हान दिले. मात्र उत्तर प्रदेशचा डाव २७२ धावात संपुष्ठात आला. महाराष्ट्राच्या डावात ऋतुराजने शिवा सिंहने टाकलेल्या ४९व्या षटकात एकूण ४३ धावा केल्या.
आता तुम्ही म्हणाल, एका षटकात ७ चेंडू कसे आले? तेही सांगतो. एका ओव्हरमध्ये एक नो बॉल पडला ज्यामुळे ७ चेंडूची ओव्हर झाली. एका ओव्हरमध्ये सहा पेक्षा अधिक षटकार मारणारा ऋतुराज हा १०वा फलंदाज आहे. या सामन्यात ऋतुराजने १६ षटकार मारले, विजय हजारे ट्रॉफीत एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम आहे. एका ओव्हरमध्ये कमीत कमी ६ षटकार मारलेल्यांच्या यादीत ऋतुराज आता आला आहे. आधी सर गारफिल्ड सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग,रास व्हाइटली, हजरतउल्ला जजई, लियो कोर्टर, कायरन पोलार्ड आणि तिसारा परेरा यांनी ही कामगिरी केली आहे.
123 Total Likes and Views