माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे हे प्रकरण लावून धरले होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी या आरोपांचा इन्कार केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अलिबागमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरु झाला आहे. किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतात का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही मातोश्रीसाठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले. मात्र, सरकार बदलल्यानंतर पहिला अहवाल आला त्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची बाब कबूल केली. २०२२ मध्ये दबावामुळे आम्ही १९ बंगल्यासंदर्भातील तपशील मिटवल्याची कबुली त्यांनी दिली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत.
92 Total Likes and Views