सध्या राज्यात नामांतराचे वारे जोरात आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी पुढे आली असताना पुण्याचेही नामांतर करा अशी मागणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्याचे नाव ‘जिजाऊ नगर’ करावे अशी मागणी आली आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्याचे नाव ‘जिजापूर’ करावे अशी मागणी केली आहे. “येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. दुसरीकडे, पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुणे शहर वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या पुण्याच्या नामांतराच्या मागणीला हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी विरोध केला आहे. ‘आधी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी इस्लामपूरचे नाव बदलावे. नंतर राष्ट्रवादीने पुण्यात हात घालावा. २० वर्ष सत्ताधारी असताना यांना हे असं काही सुचलं नाही. विरोधात बसलं की नको त्या गोष्टींचे राजकारण करायची सवय आता सोडावी.’ असं आनंद दवे म्हणाले आहेत. पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंचं भव्य आणि वेगळं स्मारक उभारा आणि ते लाल महाल येथे उभारा. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नातेसुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपती यांनीसुद्धा ते बदलले नाही. त्यापेक्षा पुण्यश्वर महादेव त्या दरग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्याबरोबर यावे राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असे आनंद दवे म्हणाले. त्यामुळे आता पुण्याच्या नामांतराचा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. पण असे वाद राज्याला परवडणारे आहेत काय? नाव बदलल्याने काय बदलते? तुम्हाला काय वाटते? पुण्याचे नाव बदलावे काय?मुळात पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण आहे. मग कशाला उणेपणा? कॉमेंट करा. वाट पाहतो तुमच्या मताची.
87 Total Likes and Views