संशय हा सर्वात मोठा शत्रू आहे. उघड शत्रू परवडला. पण नातलगही संशयाने पाहत असेल तर तो जीव घेतो, ह्याचे दर्शन नुकतेच घडले आणि महाराष्ट्र हादरला. भीमा नदीत एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. अखेर पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. करणी-काळी जादूच्या संशयातून या सातही लोकांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे चुलत भावानेच मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला संपवलं. पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
या भीषण हत्याकांडात मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे) आणि तीन लहान नातू यांनी जीव गमावला.
मृतांपैकी एक असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार तीन महिन्यांपूर्वी चुलत भाऊ धनंजय पवारबरोबर त्याची सासरवाडी पेरणे फाटा येथे गेला होता. तिथून पुन्हा घरी येताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवारचा मृत्यू झाला, तर अमोल पवार बचावला. यावरून धनंजयच्या कुटुंबाला धनंजयची हत्या झाल्याचा संशय आला. मोहन पवार यांच्या कुटुंबाने मिळून धनंजयवर करणी, काळी जादू केली आणि त्याची हत्या केली, असा संशय धनंजयच्या घरच्यांना होता. या संशयातूनच धनंजयच्या घरच्यांनी मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला भीमा नदीवर अडवलं आणि तीन लहानग्यांसह सात जणांना नदीत फेकून दिलं. यात सातही जणांचा मृत्यू झाला. माणूस किती क्रूर वागू शकतो ह्याचा हा नमुना आहे. संशयातून झालेल्या ह्या प्रकाराने सारे सुन्न आहेत.
355 Total Likes and Views