देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातलं भीमाशंकर. देशभरातले शिवभक्त येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आहे. परंतु आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचा दावा केल्याने मोठा वाद पेटला आहे.
सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे. भाजपशासित आसाम सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भाजपाला ठणकावलं आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!
श्री शिवशंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ (पुणे) हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम सरकारने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे.
सुळे यांनी म्हटलं आहे की, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. शिंदे सरकारने राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.
96 Total Likes and Views