इयत्ता बारावीची परीक्षा आज सुरु झाली. पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा झाली की काय ते सावकाश कळेल. मात्र पहिल्याच दिवशी बोर्डाच्याच चुकीने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या काही ना काही चुकांमुळे बोर्ड चर्चेत येते. इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे तर नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरेसूचनांसह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत. कृतिपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी पालक करीत आहेत.
परीक्षा म्हटले , कि मुलं टेन्शनमध्ये येतात. त्यात बोर्डच चुकरू लागले तर टेन्शन वाढते. भंडारा येथे एका केंद्रावर आज इंग्रजी विषयाचा पेपर पाहताच एक विद्यार्थिनी वर्गखोलीतच बेशुद्ध झाली. तिला ताबडतोब जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाले. काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळाची स्थिती होती. प्रशासनाने कॉपीमुक्त अभियानासोबतच ताणमुक्त अभियान राबवण्याची गरज ह्या निमित्ताने पुढे आली.
85 Total Likes and Views