केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असं नामांतर केल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादला धारशिव, असं ओळखलं जाणार आहे. या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “एका शहराचं नाव देऊन मला मोठं करा, असं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं का? महापुरुषांचा आदर करतो, त्यात दुमत नाही. पण, त्यांचं नाव घेऊन राजकारण सुरु आहे. छत्रपती
संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध आहे? त्यांचा जन्म किंवा मृत्यू येथे झाला होता का? त्यांनी येथे काही काम केलं होतं का? किंवा त्यांचं स्मारक आहे?,”
जलील पुढे म्हणाले, “तीस वर्षापूर्वी एका पक्षाचे मोठे नेते येथे येऊन म्हणतात, मला या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं आहे. त्यांची भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतला जातो. तर, मी येथून निवडून आलेला खासदार आहे. ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या भावना नाहीत का?,”
औरंगजेबचा पुळका का? असं विचारलं असता जलील यांनी सांगितलं, “औरंगजेबचा जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी आम्ही साजरी करतो का? ते एक राजा होते. तरीसुद्धा काही लोकं सांगत आहेत, की मी संभाजी महाराजांचा विरोध करत असून, औरंगाजेबचं अनुकरण करतो. मात्र, तसं काही नाही.”
नामकरण पटलं नसेल राजीनामा द्या, असं मनसेनं म्हटलं आहे. याबद्दल विचारलं असता, जलील म्हणाले, “मनसेला जास्त महत्व देत नसल्याने त्यांना उत्तर देणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पक्षाच्या सर्वेसर्वांना औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास सांगा,” असं आव्हान त्यांनी राज ठाकरेंना दिलं.
एकूणच नामांतरावर राजकारण तापताना दिसत आहे. फार पूर्वी एका नामांतर आंदोलनाच्या झळा मराठवाड्याने सोसल्या आहेत. यावेळी तसे होऊ नये अशीच जनतेची अपेक्षा आहे.
62 Total Likes and Views