काय करायचं संजय राऊतांचे ?

Editorial
Spread the love

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नको ते बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. सत्ता संघर्षाच्या अडीच-तीन वर्षात संजय भयंकर भयंकर बोलले, ते खपून गेले. आता मात्र ते चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. कोल्हापुरात मीडियाशी बोलताना त्यांनी  विधिमंडळाला चक्क ‘चोरमंडळ’ म्हटले.  सध्या विधिमंडळाचे बजेट अधिवेशन सुरु आहे.  त्यामुळे विधानसभेत ह्याचे तीव्र  पडसाद उमटणे  स्वाभाविक होते.  सत्ता पक्षाच्या आमदारांनी विधानसभा डोक्यावर घेतली.  भाजपने  हक्कभंगाची नोटीस दिली.  महाआघाडीची मोठी गोची झाली. ‘संजय राऊत चुकलेच’ असे अजितदादा पवार, नाना पटोले यांना सांगावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी  संजय राऊत यांचे वक्तव्य हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे अशा शब्दात ह्या  विषयाचे गांभीर्य  स्पष्ट केले. पण राऊत यांची मस्ती पहा. संपूर्ण विधानसभा राऊतांचे चुकलेच असे  ओरडून सांगते आहे. मात्र राऊतांना तसे काहीही वाटत नाही. ‘मी हक्कभंगाला घाबरतो काय?’ अशा शब्दात त्यांनी विधिमंडळाला ललकारले आहे. आता त्यांचे म्हणजे हक्कभंग नोटीसीचे  काय करायचे ह्यावर ८  मार्चला  नार्वेकर  निर्णय देणार आहेत. पण तुम्ही लिहून ठेवा. राऊत यांचे ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत.  महाराष्ट्राचा तुरुंग त्यांची वाट पाहतो आहे.

           पुढे त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले ते स्पष्ट  दिसते आहे. अशा प्रकरणात निर्णय करण्यासाठी  सभागृहाची हक्कभंग समिती असते. ही समिती निर्णय करते. आठ मार्चला  विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हा मामला हक्कभंग समितीकडे देतील.  ही समिती  राऊत यांना बोलावून त्यांची बाजू ऐकेल.  ‘तारीख पे तारीख’ ह्यासारखे ह्या समितीचे कामकाज नसते.  झटपट निर्णय होतो.  महिनाभरात समितीचा निर्णय येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. विशेष म्हणजे  समितीचा निर्णय अंतिम असतो. त्यावर अपील करायची सोय नसते. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असली भानगड नसते.  शिक्षा झाली तर जामीन वगैरेही नसतो.  अनेकांना  हक्कभंग समितीने  शिक्षा  ठोठावल्या आहेत. फार पूर्वी ब्लिट्झ  नावाचे एक साप्ताहिक निघायचे.  रूसी करंजिया ह्या  ब्लिट्झचे संपादक होते.   त्यांना विधिमंडळाच्या  अशाच अवमान प्रकरणात   सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. राऊत यांचाही मामला गंभीर आहे.  तेही   सहा महिन्यासाठी आत जाऊ शकतात.  कोणी त्यांना दयामाया दाखवणार नाही असाच हा अपराध आहे.  दया दाखवायची तर का दाखवायची?  खेळ खल्लास आहे. ईडीच्या मामल्यात ह्या आधी संजय राऊत  तब्बल १०३ दिवस  तुरुंगात राहिले आहेत.  आता त्यांचा त्याहून  अधिक  काळ मुक्काम  राहू शकतो.  सारखी घसरणारी जीभ  सावरणारी योगासने ह्या काळात त्यांना शिकून घेता येतील. आणखी एखादे  पुस्तक  लिहिण्यासाठी त्यांच्यासाठी ही  मोठी संधी चालून येत आहे. आत्मचिंतन करायलाही त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे.  

              टीका करायची म्हणून मी लिहित नाही.  माझे त्यांच्याशी शत्रुत्वही नाही. पण वयाची साठी उलटलेल्या संजय राऊत ह्या सारख्या ज्येष्ठ खासदाराने असे बोलावे हे दुदैवी आहे. २००४ सालापासून राऊत  राज्यसभेचे  खासदार आहेत. केवळ खासदारच नव्हे तर संपादकही आहेत. उद्धव ठाकरे यांचे उजवे हात आहेत. अशा नेत्याकडून लोकांच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात. त्यामुळे  राऊत यांची चूक माफ करण्यासारखी अजिबात नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  नेमके बोलले.  ‘हे खपवून घेतले तर उद्या रोज  हजार संजय राऊत जन्माला येतील. आम्ही गुंड आहोत का?’  असा सवाल त्यांनी केला.   शिंदे गट तर खुन्नस ठेवून असेल.  शिकार आयती जाळ्यात अडकली आहे.  राजकारणात कोणीही  नेहमीसाठी संपत नसतो. पण एकदा संपला की उठणेही अवघड असते.  आता ऐन निवडणुकीच्या वर्षात संजय राऊत  जेलात राहणार म्हणजे  उद्धव ठाकरे लंगडे होणार.  लवकरच महापालिकेच्या निवडणुका आहेत.  नन्तर लगेच २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका  आहेत.   मुंबई महापालिका म्हणजे  उद्धव यांचा जीव की प्राण.  मुंबईच्याच निवडणुकीत संजय  सोबत नसतील तर  कसे व्हायचे?  कोण शिव्या मारणार? राऊत संपले म्हणजे  उद्धव संपले. हे सारे टाळता आले असते.  उद्धव शरद पवारांच्या जाळ्यात अडकले नसते तर हे दिवस आलेच नसते. उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. पवारांनी त्यांची ही नाजूक नस ओळखली आणि जाळे  फेकले. सोनिया गांधींनाही पटवून कॉन्ग्रेसलाही सोबत घेतले. नियती मोठी क्रूर असते. महाआघाडीच्या आता चिंधड्या उडणार आहेत.  उद्धव ठाकरे  दिवसेंदिवस एकटे पडत चालले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत   महाआघाडी  गायब झालेली दिसेल.

         आघाड्या जातील-येतील. तो चिंतेचा विषय नाही. महाराष्ट्राचे राजकीय मैदान कधी नव्हे इतके विषारी झाले आहे, हा अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. पूर्वीही राजकीय पक्ष, त्यांच्यातले मतभेद  होते. मात्र विरोधकांना  शत्रू म्हणण्याची पद्धत नव्हती. ‘अमित शाह नंबर एकचे शत्रू आहेत’ असे नुकतेच  उद्धव ठाकरे म्हणाले.  शाह यांचा नामोल्लेख त्यांनी ‘मोगम्बो’ असा केला. मग आशिष शेलार यांनी उद्धव यांना ‘असरानी’ म्हटले.  शिमगा वर्षातून एकदा येतो.   मात्र शिमगा वर्षभर साजरा करण्याची सवय  सर्वच राजकारण्यांना लागताना दिसते आहे.  राजकीय विरोधकांवर  बेफाम आरोप करण्याची नवी संस्कृती  मूळ  धरते आहे.  काही ना काही वादग्रस्त, विखारी वक्तव्ये करून  सामाजिक आरोग्य बिघडवून टाकण्याचे प्रयत्न सातत्याने  होत आहेत.  पूर्वीही प्रचंड आरोप होत. तरी व्यक्तिगत स्नेह  कटाक्षाने जपला जाई. बाळासाहेब ठाकरे  हे शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे. मात्र दोघांचे मैत्र उभ्या राज्याने   अनुभवले आहे.  काही तिरकस टोमणा आला तर यशवंतराव चव्हाण  स्वतः दिलगिरी व्यक्त करीत.  अशी वैभवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात आज असे काय घडले  आहे, की विरोधक एकमेकांच्या जिवावर उठ्ल्यासारखे  वागत आहेत? संजय राऊत यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरु आहे. पण ते एकटेच दोषी आहेत का?   त्यांच्यासोबत  मिडिया आणि  वाहिन्यावाल्यांनाही आत टाकले पाहिजे. राजकारणी नको ते बोलतात. पण मिडीयावाले ते दाखवतात कशाला?  दाखवू नका ना?  दाखवतात म्हणून सारा प्रोब्लेम आहे.  चलचित्रवाहिन्यांनी  राजकारण्यांना बिघडवले आहे. टीआरपी मिळवण्याच्या नादात सनसनाटी वक्तव्ये पेरली जातात.  कोंबड्यांच्या झुंजीप्रमाणे  पुढाऱ्यांना झुंजवले जाते. चोर म्हणायची राऊतांची ही पहिली वेळ नाही. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना  कधी हटकले नाही. उलट माझा बाप चोरला म्हणून उद्धव छाती बडवत होते. ‘गद्दार’, ‘नामर्द’, ‘हलकट’ असले शब्द उद्धव यांनीच  राजकीय डिक्शनरीत आणले. राऊत मध्यंतरी जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक जहरी बोलणाऱ्या  सुषमा अंधारे यांना त्यांनी मैदानात उतरवले. ही संस्कृती बदलायची असेल तर  केवळ शिक्षा करून भागणार नाही.  राहुल नार्वेकर यांनी आता विषयाला हात घातलाच आहे तर मुळाशी गेले पाहिजे.  आचार संहितेच्या धर्तीवर ‘वाचा संहिता’ आणली पाहिजे. सामान्य माणसाची जगण्याची लढाई दिवसेंदिवस अवघड होत चालली असताना  आपण नक्की कोणती भाषा बोलावी याचे भान राजकारण्यांनी राखले तर  महाराष्ट्रावर थोर उपकार होतील. उद्धव ठाकरे संपतात की एकनाथ शिंदे, ह्या पेक्षा पूर्वीचा सुसंस्कृत महाराष्ट्र टिकणे  अधिक महत्वाचे आहे.

-मोरेश्वर बडगे

 81 Total Likes and Views

0 Comments

No Comment.