साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. चेहऱ्यावरील लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे श्रीपूजकांच्या वकिलांनी म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीचे दोन छायाचित्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती नाजूक अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मूर्तीच्या काही भागांना देखील इजा झाल्याचेही समोर आले होते. मूर्ती संवर्धन प्रक्रियेवर देखील शंका निर्माण करण्यात आली होती. याची तत्काळ गंभीर दखल घेत राज्य पुरातत्व खात्याने अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली आणि अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. यानंतर पुन्हा गेल्या मंगळवारी केंद्रीय पुरातत्व खात्याने अंबाबाई मंदिरात येत मूर्तीची पाहणी केली. यावेळी मूर्तीबरोबर छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला.
श्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रिया बाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचा गंभीर आरोप पुजकांनी केंद्रीय पुरातत्त्व खात्यावर केला आहे. यामुळे या संपूर्ण मूर्ती संवर्धन प्रक्रियेत मोठा वाद होण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच अहवाल सादर करणार असून या अहवालानंतर संवर्धन संदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहितीही पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
456 Total Likes and Views