वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण यांनी शिर्डीचे थोर संत साईबाबा यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात शास्त्री यांना सवाल करण्यात आला की, साईबाबांची पूजा करावी की करू नये? यावर शास्त्री म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) यावेळी शास्त्री यांनी साईबाबांना ईश्वर मानायला नकार दिला.
जबलपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री भगवत गीतेचं पारायण होतं. शास्त्री आणि जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीने शास्त्री यांना साई बाबांबद्दल प्रश्न केला होता. शास्त्री म्हणाले की, आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या, त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही.
शास्त्री पुढे म्हणाले की, कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील. पण हे बोलणं खूप गरजेचं आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही.
191 Total Likes and Views