मीठ म्हणजे आपण रोज खात असलेल्या सोडियम क्लोराईडमधील सोडियम. मानवी शरीराला रोज दोन ग्राम सोडियम पुरेसे होते. म्हणजे आपण गरजेच्या दुप्पट मीठ खातो आहे का? गरजेच्या दुप्पट –तिप्पट मीठ खाणारे ह्या जगात कोट्यवधी लोक आहेत. आज जगाची मिठाची रोजची आहार सरासरी १०.८ ग्राम आहे. ती तातडीने किमान निम्मी व्हायला हवी असा डॉक्टरांचा सल्ला आहे. गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्ले तर रक्तदाबाचा आजार सुरु होऊ शकतो. बीपीच नव्हे तर हार्टचा आजार आणि लकवासुद्धा मारू शकतो. लट्ठपणा, हाडे ठिसूळ होणे, किडनीचे आजार यांचा मिठाच्या अतिसेवनाशी संबंध आहे असे संशोधकांना लक्षात आले आहे.
कमी मिठाच्या जेवणाची सवय लहानपणापासूनच लावायला हवी. जागतिक आरोग्य संघटना गेली काही वर्षे हे ओरडून सांगत आहे. तरीही मिठाचा बेछूट वापर वाढला आहे. आपल्या खाण्यात नकळत मीठ जास्त खाल्ले जाते. पापड, लोणचे ह्यातून मीठ जास्त पोटात जाण्याचा धोका असतो. तेव्हा मोजके खा आणि मीठ कमी असेल याची काळजी घ्या. रेडी टू मेक खाद्यपदार्थ, हॉटेल्स, फास्ट फूड आपण सारखे सारखे घेत असाल तर तुम्हाला धोका आहे. कारण अशात मीठ जास्त असते. कमी मिठाचे जेवण म्हणजे आजारी माणसाचे जेवण ही व्याख्या आपल्या डोक्यात बसलेली व्याख्या काढून टाका. केवळ मिठावरचा हात आखडता घेतला तरी पुढच्या सात वर्षांमध्ये आपण ७० लाख प्राण वाचवू शकू असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र ऐकतेय कोण? सरकारं आणि लोकांच्या उदासीनतेमुळे मिठाचा फास वाढत चालला आहे. पुढच्या १०-२० वर्षात लाखो लोकांचे प्राण, कोट्यवधी आजारपणे आणि वैद्यकीय उपचाराचे अब्जावधी रुपये वाचवायचे असतील तर मिठाचा वापर तातडीने निम्म्यावर आणायची गरज आहे. दवाखाने चढायचे नसतील तर एवढे नक्की करा. आहे का तयारी?
111 Total Likes and Views