उगाच सद्गुणविकृतीही दाखवू नये!

Editorial
Spread the love

कनाथ शिंदेंची शिवसेना सोबत येणे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत येणे यात गुणात्मक फरक आहेच. एकनाथ शिंदे मूळ विचारधारेकडे परत आले, तर अजित पवार विरोधी विचारधारा घेऊन आले आहेत.

हे अस्वच्छ राजकारण (dirty politics) आहेच, २०१९-२४ ही पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी चाललेल्या चढाओढीसाठी लक्षात राहतील.

मात्र याची सुरुवात कुणी केली? उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोनही न उचलून या सगळ्याची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे विचारधारेशी प्रतारणा न करते, आणि सत्तेत अधिकाधिक वाटा घेत (उपमुख्यमंत्री पद) सहभागी होते, तर पुढच्या गोष्टी न घडत्या.

हलक्या सल्लागारांचे ऐकून उद्धव ठाकरेंनी जे नामधारी मुख्यमंत्रीपद मिळविले त्यावेळीच या राजकीय युद्धाची सुरुवात झाली. अजित पवार मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही देवेंद्र फडणवीसांच्या सोबत होते. केवळ अजित पवार नाही तर त्यांचे अनेक सहकारी होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार केव्हा ना केव्हा भाजपसोबत जाणार हे मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सर्वांना माहीत होते. मग असे आंतर्विरोधाने ग्रासलेले सरकार चालवून उद्धव ठाकरेंनी काय मिळविले? पक्ष गमावला, चिन्ह गमावले.

‘शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात’ – वयाच्या ऐंशीपार केवळ हीच बिरुदावली शरद पवार मिरवू शकतात. २०१९ मध्ये भाजपसोबत सरकार बनविण्याचे नक्की करून आयत्यावेळी विश्वासघात करणे पवारांच्या पारंपारिक राजकारणाचा भाग होता. अतिशय तल्लख बुद्धी, लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता, प्रगल्भ राजकीय जाण या दैवदत्त गोष्टी लाभूनही पवार ‘मोदींआधीचे मोदी’ बनू शकले नाहीत. १९९० च्या दशकात देशाचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी पवारांकडे होती, मात्र विश्वासार्हता नसल्याने ते घडू शकले नाही. सत्तेचे संधीसाधू राजकारण त्यांच्या आड आले. पुढच्या ३० वर्षांत पवार तेच करीत राहिले, आणि त्याचसाठी ते लक्षात राहतील हे देशाचे आणि त्यांचेही दुर्दैव!

भाजपने जे निर्मम राजकारण महाराष्ट्रात चालविले आहे ते सभ्य, सुसंस्कृत नाही, त्याचे तात्विक समर्थन करणे शक्य नाही. मात्र हे राजकारण ‘अपरिहार्य’ होते. समोर तलवारी पारजल्या जात असताना सत्याग्रह करणे मूर्खपणा ठरतो. साधनसुचिता आणि विवेकाचा ठेका केवळ भाजपने घ्यायचा आणि इतरांच्या सत्तेच्या साठमाऱ्या ‘मुत्सद्देगिरी’ ठरवायची हे पवारांच्या चमच्या पत्रकारांना शोभून दिसतं, सामान्य मतदाराने या बुद्धिभेदात अडकण्याचे कारण नाही.

संपूर्ण जगभर अघोषित युद्ध सुरू आहे. फ्रान्ससारख्या ‘सेक्युलर’ देशात उसळलेल्या दंगली बेल्जियम, स्वित्झर्लंड पर्यंत पोहोचल्या आहेत. Black lives matter च्या नावाखाली हा खेळ अमेरिकेत खेळून झाला आहे. शाहीनबाग आणि शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारतात याची एक फेरी पार पडली आहे. डावे, सेक्युलर, लिबरल या नावाखाली केवळ अराजकता माजवायची हे काहींचे ध्येय आहे.

भारतात समान नागरी कायदा आणि नागरिक नोंदणी कायदा (NRC) येऊ घातले आहेत. पवारांनी समान नागरी कायद्याविरुद्ध काड्या घालायला सुरवातही केली होती. अचानक महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू झाले ही ‘खेळी’ कुणाची होती हे ओळखणे फारसे कठीण नसावे. पंढरपूर वारीमध्ये जे ‘सेक्युलर’ चाळे केले गेले आणि त्याचा उदो उदो माध्यमांतून केला गेला तो कुणी व का केला हे ही सहज कळण्यासारखे आहे.

२०२५ मध्ये मोदी निवृत्त होणार अशी एक दाट शक्यता आहे. तोपर्यंत काय साध्य करायचे याचे हिशेब त्यांच्या डोक्यात पक्के असणार. ते साध्य करण्यासाठी ‘प्रचंड’ बहुमत सोबत लागेल याचीही जाणीव त्यांना असणार. मोदी निवृत्तीनंतर हिमालयात जाणार, त्यांचे ना कुणी नातेवाईक आहेत, ना चेले चपाटे. त्यामुळे महाराष्ट्रात जे घडले त्यात भाजपतील कुणाचा वैयक्तिक स्वार्थ आहे असे कुणी म्हणू शकणार नाही.

त्यामुळे जे घडले त्यात आपल्याला न दिसणारे काहीतरी उच्च ध्येय आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. याचे समर्थन करण्याचे काही कारण नाही, मात्र उगीच महापवित्र असण्याचा आव आणून सद्गुणविकृती ही दाखवू नये.

शांत राहूया आणि मोदींवर विश्वास ठेवूया!

जय श्रीराम.

 61 Total Likes and Views

0 Comments

No Comment.