‘पार्टी वुईथ डिफरन्स्…’

Editorial
Spread the love

दादा गटाची बारा दिवसांची दमछाक झाल्यावर शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप एकदाचे झाले. ‘दादांना अर्थखाते मिळणार’ हे ठरलेच होते. त्या अटीवरच त्यांनी बंडखोरी केली. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाची, चांगली खाती मिळवून दिली. शिंदेगटात अस्वस्थता दिसत नसली तरी मनात खदगद आहेच…  मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्याकडील खात्याला हात लावू दिला नाही… फडणवीस यांनी ज्या उद्देशाने ही दुसरी फूट घडवली त्यामुळे दादागटाला चांगली खाती दिल्याशिवाय पर्याय नव्हता. १७ जुलैपासून विधानसभा अधिवेशन… त्या आगोदर खातेवाटप झाले नसते तर अधिवेशनच पुढे ढकलावे लागले असते. कारण, दादा गट  बिनखात्याचे मंत्री म्हणून सभागृहात बसणार नव्हतेच… विरोधी पक्षाने हाच मुद्दा लावून धरला असता आता पुढच्या राजकारणात म्हणजे निवडणूक होईपर्यंत फडणवीस यांची खूर्ची ‘दुसरी’ दाखवली असली तरी ती ‘तिसरी’च आहे… मुख्यमंत्र्यांनी एकही खाते सोडले नाही. फडणवीस यांच्याकडील महत्त्वाचे ‘अर्थ’ आणि ‘सहकार’ ही दोन महत्त्वाची खाती त्यांना सोडावीच लागली. ज्या नाराजीने त्यांनी  उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले तेवढीच त्यांची नाराजी खाती सोडतानाही आहेच. पण, हा त्यांचाच कमकुवतपणा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळणे शक्य नाही. ते मुख्यमंत्री होते तेव्हाही बहुमत मिळाले नाही. (२०१४-२०१९) भाजपाच्या १७ जागा त्यावेळी कमी झाल्या. आता एक पायंडी खाली उतरल्यावर फडणवीसांच्या नेतृत्त्वाला आणखीन मर्यादा आल्या आहेत. पण, चेहऱ्यावर काहीही  भाव न दाखवता, हे सगळे सहन करावे लागत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस यांना सत्तेत जायचे नव्हते… त्यांनी परस्पर जाहीर करून टाकले होते की, ‘मी महाराष्ट्र भाजपाचा अध्यक्ष होणार….’ पण, गृहमंत्री, श्री. अमित शहा यांनी त्यांना खालच्या पायंडीवर उतरवून उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावले.  राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली बहुमत मिळण्याची जर खात्री असती तर, मोदी किंवा शहा हे दोन्ही नेते ‘राजा हरिश्चंद्र’ नाहीत. ‘बहुमत मिळणार नाही’, हे स्पष्ट दिसल्यावर ही तोडफोड झाली. उत्तर प्रदेशात तोड-फोडीची गरज नाही. तिथे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला बहुमताची खात्री आहे. जिथे बहुमत मिळू शकत नाही, त्या राज्यात छिन्नी-हातोडे घेवून तोड-फोड सुरू आहे. आणि आता या व्यवसायातील फडणवीस हे  देशातील सर्वोत्तम कारागिर समजायला हरकत नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे…. सामान्य माणसांचे सगळे प्रश्न असे वाऱ्यावर पडलेले आहेत… भाजपामधील बिनीचे कार्यकर्ते कसे नाराज आहेत… ज्या पक्षाला सत्तेत घेणार नाही…. घेणार नाही… घेणार नाही…. असे तीन वेळा, मानेला झटका देवून, ज्या फडणवीसांनी तोऱ्यात सांगितले होते, त्याच फडणवीससाहेबांना ‘दादांसमोर यस सर… अर्थखाते घ्या….’ असे म्हणण्याची वेळ आली! आपल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी भिवंडी येथे पक्षाचे शिबिर घ्यावे लागले. अस्वस्थ कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी लहान मुलांना चिऊ-काऊच्या गोष्टी सांगतात तसे समजावून सांगावे लागले. त्यासाठी मोदींचे नाव वापरावे लागले. ‘हे सगळे मोदींना पाठींबा देण्याकरिता होत आहे… त्यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे… आणि म्हणून सबुरिने घ्या…. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात… काहीवेळा अनैतिक निर्णय घ्यावे लागतात….’ अशी चलाखीची भाषणे त्यांना करावी लागली. फडणवीस आता िकती खालच्या पायंडीवर उतरले, तेही त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून महाराष्ट्र पाहतो आहे. ‘पार्टी वुइथ डिफरन्स’.. म्हणजे ‘आमचा पक्ष अन्य पक्षांच्या राजकीय चारित्र्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे,’ अशी ही भाजपाच्या राजकीय चारित्र्याची जाहिरात होत होती. आता हा जो काही ‘डिफरन्स’ आहे आणि तो इतक्या टोकाला गेलेला आहे की, खरोखरच घाणेरड्या राजकारणाच्या निसरड्यावरून देशातील इतर कोणताही पक्ष इतका आपटलेला नाही… त्यामुळे भाजपाचे जे ब्रीद वाक्य होते…. ते उलट्या अर्थाने त्यांना आजही लागू आहे. वाजपेयींचा भाजपा हा राजकीय पक्ष होता. राष्ट्रीय विचार होता… सत्तेकरिता तोड-फोडीची भाषा करणारा नव्हता… त्याचे समर्थन करणारा नव्हता… फक्त एकच मत कमी होते म्हणून वाजपेयींचे सरकार पडले… (१६ एप्रिल १९९९ ) पण ते वाचवावे म्हणून वाजपेयींनी त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना ‘तोड-फोड करा’,  असे कधीच सांगितले नाही. सगळ्यांनाच माहिती आहे की, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर रायगडमधून विजयी झालेले रामशेठ ठाकूर… हे लोकसभेत अपक्ष खासदार म्हणून होते. कारण, शे. का. पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता नव्हती. त्यांचे मत मिळवण्याकरिता प्रमोद महाजन यांनी टोपलीभर आश्वासने दिली. रामशेठ यांनी ते अमान्य केले. शेवटी एवढी विनंती केली की, पंतप्रधानांना भेटायला काय हरकत आहे…? रामशेठनी ते मान्य केले. पंतप्रधानांना भेटायला ते गेले… त्यांना पाहताच वाजपयींनी हसतमुखाने शब्द उच्चारले की, ‘आओ, ठाकूरसाहब…. मेरी सरकार राम भरोसे है…. ’ त्या निर्णायक क्षणालासुद्धा वाजपेयींच्या चेहऱ्यावर ताण-तणाव नव्हता. उलट रामशेठ ठाकूर नावावर कोटी करून त्यांनी सहजपणे विषय सांगितला….  रामशेठ यांनी आपली असमर्थता व्यक्त केल्यावर त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल वाजपेयीजींनी आदर व्यक्त केला. ‘मैं आपकी भूमिका की कदर करता हूँ’ या शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्या काळात ‘पार्टी वुइथ डिफरन्स’ ही पाटी भाजपाच्या कार्यालयातील भिंतीवर शोभणारी होती.  आता परिस्थिती पूर्ण उलटी झाली आहे. भाजपाला जी लाचारी करावी लागत आहे… तशी वेळ महाराष्ट्रात कोणत्याही पार्टीवर सध्या आलेली नाही. त्यामुळे भाजपा हा तोंडावर आपटलेला आहे. आणि फडणवीस यांच्या भाषणात आता तडजोडीची भाषा आलेली आहे. अशी एकंदर सगळी मजा आहे. राजकारणात नैतिकतेचा चिवडा झाला… सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया कमालीच्या तिखट आहेत… शिवाय सामान्य माणसांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांशी या सत्तेच्या साठमारीत काहीही घेणे- देणे राहिलेले नाही. हेही लोक पाहात आहेत. मुख्यमंत्री आपल्या परिने व्यक्तिगत मदतीत सामान्य माणसाला जेवढी मदत करता येणे शक्य आहे… ते ती मदत करत असले तरी मनातून तेही नाराज असावेत. पण, या तोड-फोडीत सर्वात जास्त नाचक्की भाजपाचीच झालेली आहे. त्यात भरीला भर म्हणून भिवंडी येथील भाजपाचा मेळावा…. सकाळी ९ ते संध्याकाळी ६.०० ही मेळाव्याची वेळ. त्या मेळाव्याला नाव दिले होते ‘प्रशिक्षण शिबीर…’ त्या शिबिरात भाजपाचे अध्यक्ष बावनकुळे…. ज्या बावनकुळे यांना २०१९ साली मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विधानसभेचे तिकीट कापले होते…. तेच बावनकुळे भाजपाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष झाले. त्यांनी त्यांच्या भाषणात विधानसभेच्या २८८ जागांचे निकालच जाहीर करून टाकले. आता निवडणूक घेण्याची गरजच नाही. फडणवीस यांच्या साक्षीने बावनकुळे म्हणाले की, ‘येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे १५२ आमदार निवडणून येणार.’ बावनकुळे यांनीच १५२ हा आकडाच जाहीर करून टाकला. विधानसभेच्या जागा २८८ … यापैकी भाजपा किती जागा लढवणार… हा आकडा काही जाहीर झालेला नाही. १५२ उमेदवार विजयी होणार म्हणजे किमान १८०/१९० जागा तरी त्यांना लढवाव्या लागतील…  किंवा १५२ उमेदवार उभे करून सगळेच्या सगळे विजयी होणार असल्याची फडणवीस – बावनकुळे यांना कमालीची खात्री असू शकेल…. धरून चालू की, भापजा सध्यातरी १५२ उमेदवार उभे करणार… आणि १५२ विजयी होणार… २८८ मधून १५२ वजा झाले…. राहिले १३६ उमेदवार. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून दादा त्यांच्या सहकाऱ्यांसह जेव्हा भाजपाच्या कळपात सामील झाले, त्यावेळी ६ जुलै च्या  मेळाव्यात दादांनी  त्यांचा वेगळा गट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेच्या ९० जागा जिंकेल असे जाहीर केले आहे. दादांनीसुद्धा त्यांचा बंडखोर गट किती जागा लढवणार, हा आकडा वांद्रे येथील भुजबळ यांच्या महाविद्यालयातील मेळाव्यात जाहीर केला नव्हता. धरून चालू या की, दादांचा बंडखोर गट ९० जागा लढवणार आणि ९० जागा ते जिंकणार…. कारण फडणवीस यांच्याप्रमाणेच दांदांची लोकप्रियता काही कमी नाही. शिवाय भुजबळ, प्रफुल्ल पटेल, असे जनसामान्यांतील असामान्य लोकप्रिय नेते बरोबर असल्यामुळे हा ९० चा आकडा गाठणे, त्यांच्यागटाला अजिबात कठीण नाही. शिवाय या ९० उमेदवारांच्या प्रचारसभेत शरद पवारसाहेबांचा मोठा फोटाे असणारच आहे! त्यामुळे दादागट ९० जागा जिंकणार… बावनकुळे १५२ जागा जिंकणार… या जिंकलेल्या २४२ जागा झाल्या… राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी १३ जुलै रोजी त्यांचा राज्यव्यापी दौरा सुरू केला. त्याची सुरुवात ठाण्याहून झाली. त्या मेळाव्यात भाषण करताना एकनाथरावांनी जाहीर करून टाकले की, ‘आपल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार निवडणूक हरणार नाही… ५० च्या ५० जागा जिंकू.’ त्यामुळे मुख्यमंत्रीसाहेब ५० जागा जिंकणार…. बावनकुळे, दादा आणि मुख्यमंत्रीसाहेब हे तिघे ज्या जागा जिंकणार आहेत… त्यांची बेरीज होते २९२ एवढी. विधानसभेच्या एकूण जागा २८८… विजय मिळवताना कोणतीही कसूर राहू नये म्हणून जास्तीच्या ४ जागा असाव्यात, असा यामागे हिशेब आहे… आमदारांच्या चार जागा वाढवण्याचा प्रस्तावही १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता आहे. अर्थात विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर स्वत: वकील असल्यामुळे, ते प्रत्येक कागद कायदेशीर बाजू तपासल्याशिवाय लवकर निर्णय करत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. नैसर्गिक न्याय हे त्यांचे तत्त्व फार मोलाचे आहे. त्यामुळे चार जागा वाढवायच्या म्हटले तर, त्याची कायदेशीर तपासणी होणारच….
भाजपाने खातेवाटपात तडजोड केली असली तरी १५२ जागांवर विजय मिळवण्यात बावनकुळे कसलीही तडजोड करणार नाहीत…. आिण तसे त्यांनी फडणवीस यांना ठणकावून सांगितलेले आहे. ‘खातेवाटपात तुम्ही तडजोड केलीत म्हणून १५२ जागांच्या विजयात मी कसलीही तडजोड करणार नाही, हवा तर माझा राजीनामा घ्या…’ एवढा सज्जड दम बावनकुळे यांनी भरल्यामुळे फडणवीसांचा नाईलाज झाला म्हणतात.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल १३ जुलैला भिंवंडी आणि ठाण्यातून जाहीर झाले. आता मिळालेली माहिती अशी आहे की, एवढ्या जागा तीन पक्ष जिंकणार असल्यामुळे निवडणुकीला उमेदवार उभे करण्याची आपणाला गरजच नाही. याची खात्री विरोधी पक्षाला पटलेली असावी. शरद पवारसाहेबांचा मूळचा राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, या तिन्ही पक्षांनी जवळपास एकमताने असे ठरवले आहे की, आपण निवडणूक लढवायचीच नाही. कारण निवडणुकीचा निकाल जाहीरच झालेला आहे…
एकही जागा महाराष्ट्रात जिंकता येणार नसेल तर निवडणुकीचा हा खटाटोप करा तरी कशाला..? एकदा का भाजपाने १५२ जागा जिंकल्या की, त्यांना तोड-फोड केलेल्या पक्षाची काही गरजच उरणार नाही. आणि मग १४६ मॅजिक आकड्याचे बहुमत पार करून भाजपा एकहाती सत्ता जिंकणार आहे… ‘मीच पुन्हा येईन’ हा आपला दावा करायला मग फडणवीस हे मोकळेच आहेत… त्यानंतर मात्र दादा अणि शिंदेगटाला सत्तेत घेतले नाही तर…. दादा गटाला खात्री आहे की, ९० जागांवर विजय मिळवल्यावर, आपले विरोधी पक्षनेतेपद पक्के आहे. एकतर विरोधी पक्षनेतेपद नाहीतर उपमुख्यमंत्रीपद एवढे नक्की… मुख्यमंत्री व्हायचे आहे… ते जेव्हा जमेल तेव्हा जमेल… आणि राहिलेल्या ५० जागा जिंकणाऱ्या पक्षाचा नेता गटनेता होणारच… फडणवीस यांनी भिवंडीच्या सभेत बावनकुळे यांच्यामार्फत १५२ जागांचा हिशेब मांडून विधानसभेचा निकाल जाहीर करून टाकला आहे. फक्त बावनकुळे यांनी जागे राहावे…. २०१९ ला त्यांचेच तिकीट फडणवीस यांनी कापले होते. विनोद तावडे यांच्यासारख्या भाजपामधील सुसंस्कृत आणि समंजस नेत्यालाही घरी बसवले होते. त्यामुळे बावनकुळे यांनी यावेळी असे काही होणार नाही, याची पहिली काळजी घ्यावी, कारण १५२ जागा निवडून आणणारा मी बावनकुळे आहे, असे सांगून मुख्यमंत्रीपदावर त्यांनाही हक्क सांगता येईल. आणि कदाचित फडणवीस यांच्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायची वेळ आली तर…. त्यामुळे महाराष्ट्राचे पुढचे राजकारण आता फार चर्चा करावी, असे शिल्लक राहिलेले नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीतही बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे ४८ पैकी ४५ जागा भाजपा जिंकणार अाहे. राहिलेल्या तीन जागा त्यांनी दादागट अणि शिंदे गटाला बहुधा दिल्या असतील. त्यामुळे लोकसभेच्याही निवडणुकीची दगदग आता राहिली नाही. महाराष्ट्रातील सगळे वातावरण आता कसे निवांत झालेले आहे बघा…
पिक-पाणी, महागाई, पेरण्या न होणे, तलाव न भरणे, हे सामान्य माणसांचे प्रश्न सोडवायला ईश्वर आहेच की….. 

 सध्या एवढेच 

– मधुकर भावे

📞

9892033458

 62 Total Likes and Views

0 Comments

No Comment.