औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, नेमाडेंच्या वक्तव्याने नवा वाद

Editorial
Spread the love

औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदू द्वेष्टा असं ठरवलं आहे. पण तो हिंदू द्वेष्टा नव्हता. त्याच्या दोन बायकांना काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केलं. त्यामुळे त्याने काशीचं मंदिर फोडलं. पुस्तकं, ग्रंथ वाचले की हे समजतं. आता नव्या पिढीने ज्ञान मिळवून इतिहास समजून घेतला पाहिजे असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे.

                    मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच पेशवे हे अत्यंत नीच आणि दुष्ट होते असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

          पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र दुसऱ्या बाजीरावाने वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला असे वक्तव्य त्यांनी केले.  एवढंच काय याच कार्यक्रमात औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असंही नेमाडेंनी म्हटलं आहे.

       नेमाडे म्हणाले, मी  एम. ए.  करत असताना मुंबई विद्यापीठात येऊन बसत असे. मराठीत मी नापास होणार होतो म्हणून मी तो विषय सोडला आणि इंग्रजी विषय निवडला. पण मराठी भाषेविषयी मला प्रेम होतं म्हणून मी येऊन बसायचो. इथे अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली. दुसऱ्या बाजीरावावर मला नाटक लिहायचं होतं. वा. सी. बेंद्रे इथेच बसत असायचे. त्यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी जायचो. काय वाचायचं त्याचा सल्ला घ्यायचो. पेशवे दप्तर वाचा, इथे खूप आहे असं त्यांनी मला सुचवलं होतं. त्यावेळी मी इतिहास वाचला आणि माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत जो काही इतिहास आपण वाचत आलो तो काही खरा नाही. आपण खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजीरावावर लिहिलं पाहिजे.

 त्यांनी पुढे सांगितले, की दुसरा बाजीराव हा खूप मोठा माणूस होता कारण त्याने पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात दिला. पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरण द्यायचं झालं तर मी नानासाहेब पेशव्यांचं देईन. तरुणांना मी आज हे सांगू इच्छितो की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं कठीण आहे त्यामुळे पुस्तक वाचलं की सत्य कळतं.  नानासाहेब पेशवा कुठेही गेला की त्याचं पत्र असायचं. गोविंदपंत बुंधेले हा त्यांचा सरदार होता.  त्याला हे पत्र लिहून सांगायचे मी या या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येणार आहे. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात. असं पत्र आहे मी ते वाचलं आहे. आठ ते दहा वर्षांच्या मुली, हा माणूस (नानासाहेब पेशवे) ४०-४२ वर्षांचा. हा त्या कशासाठी तयार ठेवायला सांगायचा? हा त्यांना मारायचा की अजून काही करायचा ते माहित नाही. अशा पेशव्यांच्या तावडीतून आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी बेंद्रे यांना सांगितलं. तेव्हा बेंद्रे संतापले, इंग्रजांकडे महाराष्ट्र जाणं चांगलं आहे का? त्यावर मी त्यांना म्हटलं की आम्ही लिळाचरित्र ऐकून मोठे झालो. तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. चक्रधर स्वामी आणि तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोण आहे जगात? त्यांचा आदर्श आम्ही ठेवला. त्यामुळे खरं आहे ते आम्ही पाहिलं. इंग्रज त्यांच्यामुळेच आले. पेशव्यांच्या बदमाशीमुळेच इथे आले. इंग्रजही बदमाशच होते पण आपल्यापेक्षा कमी होते असंही नेमाडे यांनी म्हटलं आहे.

              औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या आल्याच नाहीत परत. छावणीतले लोक म्हणाले की माहित नाही. मग औरंगजेबाला हे समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं. पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात, पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं. असंही नेमाडेंनी म्हटलं आहे.

सगळ्या जुन्या गोष्टी इथेच कळतात. शिवाजीचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेर होता. स्वतःच्या लोकांवर शिवाजीचा विश्वास नव्हता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंग ज्याने शिवाजीला पकडून दिलं तो हिंदू होता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले आहेत. मग तो हिंदू द्वेष्टा वगैरे होता कसं म्हणता येईल? सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेब होता.

 58 Total Likes and Views

0 Comments

No Comment.