दाक्षिणात्य सिनेमाचा देव मानले जाणारे सुपरस्टार ७१ वर्षे वयाचे रजनीकांत यांना सिनेसृष्टीतला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत ही घोषणा केली तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नावर जावडेकर भडकले. सध्या तामिळनाडूत निवडणूक होत आहे. त्यामुळे त्याला पुरस्कार दिलाय का? असा हा प्रश्न होता. जावडेकर म्हणाले, यात राजकारण कुठून आले? रजनीकांत ५० वर्षापासून सिनेमात काम करीत आहेत. निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. जावडेकर काहीही म्हणत असले तरी ह्या निवडीचा भाजपला निवडणुकीत फायदाच होईल. काही महिन्यापूर्वी रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. पण तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तो बेत रद्द करावा लागला. रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
कुणालाही हेवा वाटावा असे हे यश त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. सुरुवातीचे दिवस खूप गरिबीत गेले. त्यांचे वडील हवालदार होते. रजनीकांत बेंगळूरूचे असले तरी त्यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजी गायकवाड असे आहे. घर चालवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ह्मालीही केली. पुढे बस कंडक्टर झाले. अभिनयाची गोडी त्यांना लहानपणापासून होती. नाटकात काम करायचे. बसचे तिकीट देण्याची त्यांची स्टाईल फेमस होती. १९७५ मध्ये त्यांचा पहिला सिनेमा आला. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा प्रत्येक सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करतो. अमिताभ, शाहरुख यांच्यापेक्षा त्यांचा रेट तगडा आहे. त्यांच्या सिनेमाचा पहिला खेळ पहाटे साडे तीनला सुरु होतो. दक्षिणचे लोक त्याला ‘देव’ मानतात. तो केवळ कमावतच नाही तर अर्धी कमाई दान देतो. आपल्याकडे ‘अंधा कानून’ मध्ये तुम्ही त्यांना पाहिले असेल.
270 Total Likes and Views