करोनाने पुन्हा धुमाकूळ सुरु केला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असणाऱ्या काही व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांना करोनाची लागण झाली होती. आता उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ह्याही पॉझिटीव्ह निघाल्याने चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी यांनी लस टोचून घेतली होती. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ह्या शब्दात राज्याला काळजी घेण्याचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरातच करोना घुसल्याने काळजी घ्यायची तरी कशी? असा प्रश्न आहे. तिकडे अभिनेता आमिर खान यालाही संसर्ग झाल्याची बातमी आली. दोन दिवसांपूर्वी तो मुख्यमंत्र्यासोबत एक कार्यक्रमात होता. आता बोला. वाईट बातम्या पिच्छा सोडायला तयार नाहीत. मंत्री धनंजय मुंडे यांना तर दुसऱ्यांदा करोना झाला आहे.
लहान मुलांना करोनाचा धोका नाही असे बोलले जाते. ४० वर्षाच्या पुढे वय असलेलेच प्रामुख्याने बाधित निघाले आहेत. मात्र आता दुसऱ्या लाटेत अनेक शाळकरी मुलेही पेशंट निघत आहेत. नुकतेच नागपुरात पाच महिन्याच्या बाळालाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पालकांची काळजी वाढली आहे. चीनमध्ये तर एका बाळाला जन्मानंतर अवघ्या ३० दिवसात करोनाची लागण झाली होती. करोना लहान-मोठा असा भेदभाव करीत नाही असे दिसते.
मंगळवारी राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये २८ हजाराची भर पडली. आता राज्यात २५ लाख रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या असणाऱ्या देशातील एकूण १० जिल्ह्यातील ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक असे हे काही जिल्हे आहेत. नागपुरात तर उद्रेक आहे. मंगळवारी तीन हजार पॉझिटीव्ह निघाले. करोना नियंत्रणाची जिच्यावर जबाबदारी आहे त्या नागपूर महापालिका मुख्यालयातच ४० कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्याने खळबळ आहे. पेशंट वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेडसाठी धावाधाव होत आहे.